तिन्ही सांजेकडे कसे बघायचे ते तुमच्या मनावर अवलंबुन असते. संध्याकाळची कातर वेळ, मन हळवे होण्याची वेळ. नकळत जुन्या गोष्टी एकापाठोपाठ एक डोळ्यासमोरून चालत राहतात अन मनाला अजूनच हल्लक करून जातात. संध्याकाळ म्हणजे दिवस संपलेला असला तरी उजेड अजून रात्रीच्या उदरात दडुन गडद झालेला नसतो. मग काळोखाला थोडा अवकाश आहे याच आशेत उद्याच्या नवीन दिवसाची आखणी चालू राहते.
कधीतरी सोबतीला येते एक विरक्त संध्याकाळ
सोबत तिच्या बोटाला धरून येत सुस्त कलंडलेले आभाळ
जमते तिच्या सोबत निरव शांततेची मैफिल
जिथे मौन गाते गीत अन आर्त स्वर होतात गाफील
मग पश्चिमेच्या रंगा सोबत बदलत जाई नूर
शब्दाविना डोळ्यातुनी बरसती सूर
शेवटी अर्धवट मिटलेल्या डोळ्यांना चुकवून संध्या सरकते अंधाराकडे
उद्याची स्वप्ने ती देऊन जाते नव्या उजाडणाऱ्या आभाळाकडे.
nicely written. keep it up
ReplyDelete